आयसीसी महिला विश्वचषक 2025: दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला, रोमांचक सामन्यात 3 विकेट्सने मात

आदित्य कदम
3 Min Read

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत आज यजमान असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३ गडी राखून विजय मिळवला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत आपले दुसरे यश नोंदवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७ चेंडू शिल्लक असतानाच हा डोंगर सर केला आणि ७ विकेट्सच्या बदल्यात २५२ धावा केल्या.

भारतीय महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न या सामन्यात थांबला. दक्षिण आफ्रिकेसाठी नडीन डीक्लार्कने जबरदस्त खेळी केली आणि विजयात निर्णायक भूमिका बजावली. तिने ५४ चेंडूंचा सामना करत नाबाद ८४ धावा केल्या.

भारताची गोलंदाजी चांगली झाली होती. दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके बसले आणि त्यांची धावसंख्या ५ विकेट्सवर ८१ अशी झाली होती. त्यावेळी सामना भारताच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत होते. कॅप्टन लॉरा व्होल्व्हार्ट आणि ट्रायॉन यांनी यावेळी डाव सावरला.

या जोडीने ८१ धावांची भागीदारी करत धोकादायक खेळ सुरू केला. या दोघांची भागीदारी क्रांती गौडने मोडली. तिने लॉरा व्होल्व्हार्टला बोल्ड केले आणि ७१ धावांची भागीदारी तोडली.

सहावा फलंदाज बाद झाल्यावर भारताला वाटले की आता सामना आपल्या हातात आहे. पण तसे झाले नाही. नडीन डीक्लार्कने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरू केली. तिने ट्रायॉनसोबत ६९ धावा जोडल्या. डीक्लार्कने ४७व्या ओव्हरमध्ये क्रांतीच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले आणि ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

तिने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. ४९व्या ओव्हरमध्ये तिने पुन्हा सलग दोन षटकार मारून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. डीक्लार्कच्या या खेळीत ५ षटकार आणि ४ चौकार होते. महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना अखेर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर झाला.

यापूर्वी फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर मधल्या फळीत गडबड झाली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह लवकर बाद झाल्या. भारताची धावसंख्या ८३ वर १ विकेटवरून ६ बाद १०२ अशी झाली.

या कठीण परिस्थितीत रिचा घोषने एकटीने लढत दिली. तिने स्नेह राणासोबत महत्त्वाची भागीदारी केली. रिचा घोषने ७७ चेंडूत ९४ धावा केल्या. स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. त्यांच्या या खेळीमुळे भारताने २५२ धावांचे लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेसाठी क्लोए ट्रायॉनने ३ बळी घेतले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *