मुंबई: मध्य रेल्वेच्या लोको रनिंग स्टाफने कामाचा वाढता ताण आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे जोरदार आंदोलन केले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याचा आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. मध्य रेल्वे मजदूर संघाच्या (Central Railway Workers Union) नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
डॉ. प्रवीण वाजपेयी आणि अनिलकुमार दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. आंदोलनादरम्यान, लोको रनिंग कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष विवेक सिसोदिया यांनी अनेक गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की कामाच्या प्रचंड ताणामुळे अनेक कर्मचारी आता स्वेच्छानिवृत्तीची मागणी करत आहेत. असे असूनही, रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत आहे.
विवेक सिसोदिया यांनी सांगितले की, हे आंदोलन मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून रनिंग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाचे धोरण खूप उदासीन असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणाच्या वेळेवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत आणि त्याच वेळी पूर्ण सुरक्षिततेत काम करण्याची अपेक्षा करणे अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले.
सिसोदिया यांनी स्पष्ट केले की, प्रवासी सुरक्षिततेसाठी आम्ही खूप कष्ट घेतो, पण आता आमची स्वतःची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. हे थांबले नाही तर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली.
लोको रनिंग स्टाफने काही महत्त्वाच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. ब्रेक व्हॅनशिवाय गाड्या चालवणे थांबवावे, रेल्वे बोर्डाच्या ड्यूटी रूल्सचे काटेकोर पालन करावे, तसेच सर्व लॉबी, रेस्ट रूम्स आणि रनिंग रूम्समध्ये रेल्वे बोर्डाच्या मानकांनुसार सुविधा असाव्यात आणि त्यांची नियमित देखभाल व्हावी, अशा प्रमुख मागण्या आहेत.
इगतपुरी, लोणावळा, पुणे, रोहा, मनमाड यांसारख्या ठिकाणच्या रनिंग रूममधील स्वच्छता आणि जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली. सायडिंग यार्डमध्ये पाथवे लाइटिंगची व्यवस्था करावी आणि मुंबई विभागातील रनिंग रूम्सची निरीक्षकांच्या उपस्थितीत तपासणी करावी, असे ही मागणीमध्ये नमूद करण्यात आले.
याशिवाय, उपनगरी रेल्वे व्यवस्थापकांसाठी परेल, दिवा, ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर विश्रांतीची व्यवस्था करावी. गुड्स ट्रेन मॅनेजर पदांची रिक्त पदे त्वरित भरावीत आणि महिला रेल्वे व्यवस्थापकांना बोर्डाच्या नियमानुसार सुविधा द्याव्यात, अशा मागण्यांचा समावेश आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे संबंधित रेल्वे मार्गांवर काही प्रमाणात परिणाम दिसून आला.