महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र आता या योजनेत मोठी घडामोड समोर आली आहे. eKYC पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 1 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
यापूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास 12 लाखांच्या आसपास होती. पण अलीकडे झालेल्या पडताळणी प्रक्रियेत अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या. काही महिलांची कागदपत्रे अपूर्ण होती, तर काही अर्ज शासनाच्या निकषांमध्ये बसत नसल्याचं स्पष्ट झालं.
यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच पुढील हप्ते मिळणार आहेत. प्रशासनाने eKYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत. मे महिन्याचा अर्धा कालावधी संपला तरी पुढील हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा राज्यात जवळपास 2 कोटी 40 लाख महिला लाभार्थी होत्या. मात्र अनेक महिलांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अतिरिक्त 500 रुपयांचाही फायदा मिळतो.
आता मार्च महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर महिलांचं लक्ष एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांकडे लागलं आहे. सरकारकडून पुढील निर्णय कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.