लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. KYC प्रक्रियेदरम्यान योग्य कागदपत्रे सादर न करू शकलेल्या महिलांना आता आणखी एक संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार, पात्र असूनही कागदपत्रांअभावी लाभापासून वंचित राहिलेल्या महिला आता जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात. त्यानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल.
यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. मात्र अनेक महिलांना वेळेत योग्य कागदपत्रे अपलोड करता आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यातील १ कोटी ७७ लाख महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने निकषात न बसणाऱ्या सुमारे ६६ ते ७६ लाख महिलांना योजनेतून वगळले आहे. त्यामुळे शासनाचा मोठा आर्थिक खर्च वाचणार असल्याचं सांगितलं जात आहे.
eKYC दुरुस्तीची अंतिम तारीख ३० एप्रिल होती. त्यानंतर लाभार्थ्यांची अंतिम संख्या निश्चित करण्यात आली. मात्र एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने आता अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या महिलांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर महिला व बालविकास कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.