PM Gharkul Yojana अंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घरकूल बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीच्या वितरणासाठी आता ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
प्रशासनाकडून रेती वितरणासाठी महाखनिज प्रणाली लागू करण्यात आली आहे. पंचायत समितीकडून मिळालेली घरकूल लाभार्थ्यांची यादी या प्रणालीशी जोडण्यात आली असून ती संबंधित रेतीघाट धारकांनाही पाठवण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी नागरिकांनी तलाठी कार्यालयात जाऊन माहिती तपासावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच आधार क्रमांक पडताळणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रेती मिळवण्यासाठी ऑनलाइन पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक, आधार माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
याशिवाय रेती वाहतुकीसाठी लाभार्थ्यांना जीपीएस असलेला ट्रॅक्टर किंवा ट्रक स्वतः उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
दरम्यान, रेतीचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. रेतीचा गैरवापर किंवा इतरांना हस्तांतरण केल्याचे आढळल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घरकूल लाभार्थ्यांसोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध शासकीय बांधकामांसाठीही रेती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.