Ladki Bahin Yojana Update: राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र अलीकडे या योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी मोठी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर निकष पूर्ण न करणाऱ्या सुमारे ८० लाख अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
यामध्ये काही महिलांचे नाव केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळेही वगळले गेले आहे. अशा पात्र महिलांना केवायसी पूर्ण करण्याची संधी दिली जाणार असून, त्यानंतर त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळू शकतो.
अपात्र आणि बोगस लाभार्थी कमी झाल्यामुळे योजनेवरील आर्थिक भार कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काळात पात्र महिलांच्या खात्यात अनुदान वेळेवर जमा होण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात अजूनही मासिक १,५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जून आणि जुलै २०२६ या दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये एकाचवेळी जमा होण्याची चर्चा आहे. मात्र याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
या योजनेच्या पडताळणीदरम्यान काही पुरुषांनीही लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाईबाबत सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.
याचदरम्यान, विधानसभेत बोलताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला राजकीय फायदा झाल्याचा आरोप केला.
अनेक महिलांना योजना संदर्भात अजूनही काही प्रश्न आहेत. पैसे खात्यात कधी जमा होणार, पैसे न आल्यास तक्रार कुठे करायची आणि त्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा, याबाबत लाभार्थी माहितीची वाट पाहत आहेत.
सध्या सरकारने दर महिन्याला ठराविक तारखेला पैसे जमा केले जातील, अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निश्चित तारीख जाहीर झाल्यास महिलांना पैसे कधी मिळणार याची स्पष्टता मिळेल आणि हप्ता न आल्यास तक्रार करणेही अधिक सोपे होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.